नव्या दमाचा भारतीय संघ   

मडविकेट,कौस्तुभ चाटे 

रोहित आणि विराटने कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली. मोठे खेळाडू निवृत्त झाल्यानंतर कोणत्याही संघाला एका संक्रमण काळातून जावे लागते. आज  भारतीय कसोटी संघ देखील अशाच काळातून जात आहे. रोहितच्या निवृत्तीनंतर भारतीय संघाचा कर्णधार कोण होणार हा महत्वाचा प्रश्न होता. या पदासाठी अनेक दावेदार होते, पण शेवटी शुभमन गिलच्या नावावर शिक्कामोर्तब झाले. काही काळापूर्वीच गौतम गंभीरची भारतीय संघाच्या प्रशिक्षकपदी नियुक्ती झाली होती, धोनी-विराट-रोहित नंतर आता गंभीर गुरुजींच्या मार्गदर्शनाखाली गिल कशी कामगिरी करतो हे बघणे महत्वाचे ठरेल. शुभमन गिलच्या कप्तानपदावर देखील अनेक प्रश्न उपस्थित केले गेले. आता इंग्लंड दौर्‍यासाठी चांगली कामगिरी करून आपल्या विरोधकांची तोंडे बंद करणे हे त्याच्याच हाती आहे. 
 
गिल बरोबरच बुमरा, पंत आणि राहुल देखील कप्तानपदाच्या शर्यतीत होते. यापैकी राहुल आणि बुमराने भारतीय कसोटी संघाचे नेतृत्व आधी केले आहे. त्यामुळे त्यांच्यापैकीच कोणाच्यातरी गळ्यात ही माळ पडेल असा अंदाज होता. परंतु निवड समितीने भविष्याचा विचार करता गिलची निवड केली असावी. मोठ्या स्तरावर शुभमन गिल कडे फक्त आयपीएलमध्ये गुजरात टायटन्स संघाची कप्तानी करण्याचा अनुभव आहे. केवळ याच अनुभवाच्या जोरावर त्याला भारतीय संघाचे कर्णधारपद दिले असल्यास ते दुर्दैवच म्हटले पाहिजे. 
 
गेल्या पाच वर्षांत कसोटी क्रिकेटमध्ये अपवादात्मक खेळी वगळता त्याला फलंदाज म्हणून देखील प्रभाव पाडता आला नाही. त्याने कसोटी क्रिकेटमध्ये केलेल्या पाच शतकांपैकी फक्त एक शतक भारताबाहेर आहे, ते देखील चट्टोग्राम येथे बांगलादेश विरुद्ध. गेल्या ऑस्ट्रेलिया दौर्‍यात देखील त्याची कामगिरी यथातथाच होती. त्याला ३ कसोटींमध्ये केवळ ९३ धावा करता आल्या. इंग्लंडमध्ये देखील तो केवळ एकच कसोटी सामना खेळला आहे. (२०२२ मध्ये इंग्लंड विरुद्ध बर्मिंगहॅम येथे) त्या सामन्यात त्याने दोन्ही डावात मिळून फक्त २१ धावा केल्या आहेत. अशावेळी त्याला कर्णधार करून निवड समितीने मोठा धोका पत्करला  आहे असे वाटते. कदाचित बुमरा किंवा राहुल या पदासाठी योग्य ठरले असते. 
 
भारतीय संघनिवड बघता, मिश्र भावना आहेत असे म्हणता येईल. काही खेळाडूंना मिळालेली संधी म्हणजे त्यांच्या देशांतर्गत क्रिकेट, रणजी ट्रॉफी स्पर्धेतील कामगिरीची दखल आहे, तर काही खेळाडूंची वर्णी त्यांच्या ’इतर’ खेळामुळे झाली असावी असा विचार करायला वाव आहे. अभिमन्यू ईश्वरन, साई सुदर्शन सारख्या खेळाडूंनी गेल्या काही वर्षांमध्ये देशांतर्गत स्पर्धेत चांगली कामगिरी केली आहे, त्या जोरावर त्या दोघांची निवड होणे स्वाभाविक होते. हीच गोष्ट करुण नायरला लागू पडते. रणजी ट्रॉफीमध्ये केलेल्या कामगिरीमुळे जवळजवळ ८ वर्षांनी तो देखील भारतीय संघात दाखल झाला आहे. शार्दूल ठाकूरने देखील चांगला खेळ करून भारतीय संघात पुनरागमन केले आहे. जयस्वाल, राहुल, नितीश रेड्डी आणि रवींद्र जडेजा देखील आपले स्थान टिकवण्यात यशस्वी झाले आहेत. 
 
ऋषभ पंतची उपकर्णधारपदी निवड करण्यात आली आहे. ही निवड देखील पूर्वपुण्याईच्या जोरावर झाली असावी हे मानायला वाव आहे. पंतने अपघातानंतर चांगले पुनरागमन केले असले तरीही त्याचा खेळ म्हणावा तसा झाला नाही. अपवादात्मक खेळी वगळता २०२४ या वर्षात तो अपयशीच ठरला आहे. या कालावधीत त्याच्या नावे केवळ एक शतक आहे. त्याहीपेक्षा महत्वाचे म्हणजे परिस्थिती विपरीत खेळ करण्याचा त्याचा स्वभाव. त्या स्वभावाचा संघाला कायम फटका बसला आहे. आणि यष्टीरक्षक म्हणून देखील संघात निवड झालेला ध्रुव जुरेल त्याच्यापेक्षा सरस आहे हे नक्की. 
 
या संघात फलंदाजी विभागात प्रामुख्याने काही नावांचा अभाव दिसतो, ज्यामध्ये श्रेयस अय्यर आणि ऋतुराज गायकवाड यांचे नाव घ्यावे लागेल. या दोघांनीही अनेकदा उत्तम खेळी केल्या आहेत, आणि इंग्लंडसारख्या लहरी वातावरणात त्यांचा नक्की उपयोग करून घेता येतो. सर्फराज खानला वगळणे हा देखील चर्चेचा विषय आहे. त्याला काही ’इतर’ कारणांमुळे संघाबाहेर ठेवल्याची वदंता आहे. रणजी ट्रॉफी स्पर्धेत सर्वाधिक धावा करणार्‍या (१० सामन्यात ९६० धावा, ५ शतके) विदर्भाच्या यश राठोडचा देखील विचार करणे आवश्यक होते, पण त्याला भारताच्या ’अ’ संघात देखील स्थान दिले गेले नाही. अष्टपैलू खेळाडूंमध्ये रवींद्र जडेजा, शार्दूल ठाकूर, वॉशिंग्टन सुंदर, नितीश रेड्डी पैकी कोण अंतिम ११ मध्ये खेळेल हे सांगता येणे या क्षणी अवघड आहे.
 
 गोलंदाजीची धुरा अर्थातच बुमराकडे असेल, पण त्याने आधीच पाचही कसोटी सामने खेळण्याबाबत असमर्थता दर्शवली आहे. त्यामुळे ’रोटेशन पॉलीसी’प्रमाणे सर्वच गोलंदाजांना आपापली जबाबदारी पार पाडावी लागेल. सिराज, प्रसिद्ध, आकाशदीप, कुलदीप यादव पैकी एकतारी गोलंदाजाला आता बुमराच्या खांद्यावरील ओझे स्वतःकडे घ्यावे लागेल. डावखुरा अर्शदीप सिंगने प्रथमच कसोटी संघात स्थान मिळवले आहे. तो उत्तम गोलंदाज आहे, आणि इंग्लिश वातावरणात तो नक्की प्रभावी ठरू शकतो. कदाचित पहिल्यांदाच भारतीय गोलंदाजी, फलंदाजीपेक्षा जास्त प्रभावी वाटते आहे. 
 
शुभमन गिलच्या नेतृत्वाखालील भारतीय संघ इंग्लंडमध्ये कशी कामगिरी करेल याकडे क्रिकेट रसिकांचे लक्ष आहे. सलग दोन वेळा कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश केल्यानंतर यावर्षी भारतीय संघाला अंतिम फेरी गाठण्यात अपयश आले आहे. या इंग्लंड सिरीज पासून कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचा नवीन हंगाम सुरु होईल. त्यावेळी चांगली कामगिरी करून ती गदा मिळवण्यासाठी प्रयत्न करणे हे या संघाचे प्राथमिक उद्दिष्ट असले पाहिजे. विराट-रोहितच्या निवृतीनंतर नवीन फलंदाज त्यांची उणीव भासू न देण्यासारखा खेळ करतात का हे बघणे देखील महत्वाचे आहे. एकूणच भारतीय संघाचा इंग्लंड दौरा सर्वार्थाने महत्त्वाचा आहे, आणि भारतीय क्रिकेट रसिकांचे लक्ष या नव्या दमाच्या संघाकडे आहे. 

Related Articles